मुंबई: करोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज करोनाच्या 2682 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 35 हजार 967 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11 दिवस होता तो आता 15.7 दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.38 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे.
दिवसभरात 116 जणांचा मृत्यू
राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 77 पुरुष, तर 39 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 116 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील वयाचे 48 रुग्ण होते. 55 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील होते. तर 13 जण 40 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. करोनाची लागण होऊन राज्यात आत्तापर्यंत 2098 मृत्यू झाले आहेत. आज नोंदवण्यात आलेल्या एकूण मृत्यूंपैकी 46 मृत्यू हे मागील दोन दिवसातले आहेत.