मुंबई : शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. त्यामुळे सरकार कोसळतं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता घडामोडींना वेग आला असून शिंदे समर्थक आमदार परत येण्याच्या तयारीत असल्याचं कळतय.
आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून केल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे यांचं बंड फसत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिंदे सध्या 35 आमदारांसह सुरतमध्ये आहेत. मात्र, त्यातील एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. तर काही आमदारांच्या कुटुंबियांनी अपहरण झाल्याचीही तक्रार पक्षाकडे केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालं आहे.