पुणे – राज्य शासनाने येत्या सोमवारी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यातील बहुतांश शाळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. मात्र, मुलांची उपस्थिती कितपत राहील, याविषयी शाळा व संस्थाचालकांमध्ये सांशकता आहे.
राज्य शासनाने करोना परिस्थितीचा विचार करता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळांनी सर्व परिसर सॅनिटाइज करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे दिवसांतून दोनवेळा सॅनिटाइज करण्याचे नियोजन सुरू आहे.
पालकांची बैठक घेऊन शाळेने काय काळजी घेत आहे, त्याची माहिती शाळेकडून देण्यात येत आहे. शाळेचे सर्व प्रवेशद्वार खुले करण्यात येणार असून, सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
काही कालावधी निश्चित करून टप्प्याटप्प्याने इयत्तानिहाय शाळा सुटण्याविषयी वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. पालकांना हमीपत्र पाठवून, तसे संमती लिहून घेण्याची कार्यवाही शाळेने सुरू केली आहे.