लाहोर – आम्ही कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या मैदानावर खेळतो यामुळे मला काही फरक पडत नाही. मला वाटते की आम्ही केवळ भारताविरुद्धच नाही तर विश्वचषक खेळणार आहोत. आमचे लक्ष केवळ एका संघावर (भारत) नाही, नऊ आणखी संघ असतील; ज्यांना आम्ही पराभूत करून अंतिम फेरी गाठू शकतो.
व्यावसायिक खेळाडू म्हणून जिथे जिथे क्रिकेट खेळले जाते, जिथे जिथे सामने होतात तिथे पाकिस्तान संघ जाऊन खेळेल. आम्हाला प्रत्येक देशात प्रत्येक परिस्थितीत कामगिरी करायची आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांनी आता तयार राहावं, असे आव्हान पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यानं दिलं आहे.
एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात खेळवला जाणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी स्टेडियम असून सुमारे एक लाख 32 हजार प्रेक्षकांमध्ये हा सामना खेळला जाऊ शकतो.
मात्र, सध्या पाकिस्तानचा संघ सरकारच्या परवानगीची वाट पाहात आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सर्व संघांना खुले आव्हान दिले आहे. आपण कोणत्याही संघासोबत कुठेही खेळण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले आहे. वास्तविक, बाबरचे हे वक्तव्य त्या प्रकरणानंतर आले आहे जेव्हा आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने, पीसीबीने वर्ल्ड कपचे स्थळ बदलण्याची मागणी फेटाळून लावली होती.
पीसीबीने अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकप सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. पीसीबी चेन्नईतील चेपॉक येथे अफगाणिस्तान आणि बेंगळुरूमधील चिन्नास्वामी येथे ऑस्ट्रेलिया खेळू इच्छित नव्हते. तसेच अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध न खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, आयसीसीने सर्व मागण्या फेटाळून लावल्या.
पाकिस्तानला अहमदाबादव्यतिरिक्त हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या पाच मैदानांवर सामने खेळायचे आहेत. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर म्हणाला की, ब्रेकनंतर पुन्हा खेळण्यासाठी आम्ही उत्साहित असून विश्वचषकापूर्वी चांगली तयारी करण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 जुलैपासून गाले येथे तर दुसरा कसोटी सामना 24 जुलैपासून कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.