मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने राज्य सरकारमध्ये एन्ट्री केल्याने सत्तेची समीकरणे बदलली आहेत. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात नाराजीची भावना असल्याचे दडून राहिले नाही. अशात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरूवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्या लेट-नाईट बैठकीत नेमकं दडलयं काय यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि भाजपने एकत्र येत वर्षभरापूर्वी सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिंदे गटातील अनेक इच्छूक मंत्रिपद मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांची प्रतीक्षा मंत्रिमंडळ विस्तारामुळे संपणार असल्याचे संकेत मागील काही दिवसांपासून मिळू लागले. बहुप्रतीक्षित विस्तार झाला खरा. पण, संबंधित इच्छुकांच्या दृष्टीने घडले भलतेचं.
अजित पवार गटाला सरकारमध्ये सामावून घेतले गेल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. राज्य मंत्रिमंडळाची सदस्य संख्या आता 29 इतकी झाली आहे. अजूनही 14 मंत्रिपदे रिक्त आहेत. पण, सत्तेतील भागीदार वाढल्याने आता शिंदे गटाच्या वाट्याला कमी मंत्रिपदे येणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची आकांक्षा पूर्ण होण्याविषयी इच्छुकांना साशंकता वाटू लागली आहे. त्यातून शिंदे गटात नाराजी, अस्वस्थता पसरल्याचे काही आमदारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे समोर आले.
मात्र, स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरूवारी कुठली नाराजी असल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. ते स्पष्टीकरण दिल्यानंतर शिंदे यांची अचानकपणे आणि रात्री उशीरा फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शिंदे-फडणवीस बैठकीतील चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. त्यामुळे राजकीय पतंगबाजीला हवा मिळणार आहे.
लेट-नाईट बैठकीवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. त्या बैठकीमुळे शिंदे गटातील अस्वस्थतेवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे गटातील आमदारांना आता मंत्रिपदे मिळण्याची शाश्वती वाटत नाही.
अजित पवार गटाकडे महत्वाची खाती जाण्याची चिंता त्यांना वाटत आहे. बंडाचा खटाटोप निष्फळ ठरण्याची धास्ती त्यांना आहे. मतदारांना सामोरे जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी निवेदनाद्वारे दिली.