मुंबई – करोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था दोन वर्षे ठप्प झाली होती. त्यामुळे हा परिणाम संपुष्टात येण्यास किमान 12 वर्षे लागू शकतात असे मत रिझर्व बॅंकेच्या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. या दोन वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेवर तब्बल 52 लाख कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे.
चलन आणि वित्त विषयावरील करोनाच्या खुणा या प्रकरणांमध्ये म्हटले आहे की या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र करोनाच्या लाटावर लाटा येत असल्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पहिली लाट येऊन गेल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच पुन्हा दुसऱ्या वर्षी एप्रिल- जूनमध्ये दुसरी लाट आली. सर्व काही सुरळीत चालत असताना जानेवारी 2022 मध्ये पुन्हा तिसरी लाट आली.
आता परिस्थिती पूर्ववत होत असतानाच 24 फेब्रुवारी रोजी रशिया- युक्रेन दरम्यान युद्ध सुरू झाले. त्यामुळे भारत आयात करत असलेल्या सर्व वस्तूंच्या किमती महाग झाल्या. त्याचबरोबर भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागत आहे. या दोन वर्षाच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान झाले आहे.
तीन वर्ष नुकसान
2012 पासून 2019 पर्यंत भारताचा विकासदर 6.7 टक्के होता. 2020-21 मध्ये तो उणे 6.6 टक्के झाला. एकूण आकडेवारीचा विचार केल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था करोनातून बाहेर पडण्यास खऱ्या अर्थाने 2034-35 साल उजाडणार आहे. 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेचे 19 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 2021-22 मध्ये 17 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर 2022-23 मध्ये 16 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे अभ्यास अहवालात म्हटले आहे.