Ravindra Waikar । उद्धव ठाकरे यांची साथ सॊडून आमदार रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काल रात्री जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशा दरम्यान वायकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यावरच काल अखेर शिक्कामोर्तब झाला.
पक्षप्रवेश करतेवेळी वायकर यांनी आपली नेमकी भूमिका काय आहे याविषयी सविस्तर मत मांडले. यावेळी बोलताना “गेली ५० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. १९७४ सालची जोगेश्वरीच्या पहिल्या दंगलीपासून मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करतोय. पडेल ते काम मी केलेले आहे. चार वेळा नगरेसवक, चार वेळा स्थायी समितीचं अध्यक्षपद, तीन वेळा आमदार झालो. मात्र मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण वेगळं आहे.
“….तर मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही” Ravindra Waikar ।
पुढे बोलताना वायकर यांनी,“सत्तेत असल्याशिवाय धोरणात्मक निर्णय होऊ शकत नाहीत. लोक आपल्याला निवडून का देतात. लोकप्रतिनिधींनी सामान्यांच्या समस्यांवर काम करावे, असे लोकांचे मत असते. याच कारणामुळे निर्णय बदलणे हे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. देशात ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे विधानसभेत वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी आज शिंदेंच्या शिवसेनेत आलो आहे. हे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही,” असे वायकर यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले ? Ravindra Waikar ।
वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “रविंद्र वायकर यांनी बाळासाहेबांचे खरे विचार जोपासणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. गेली ४० ते ५० वर्षे बाळासाहेबांसोबत त्यांनी शिवसेनेचे काम केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळेच शिवसेनेचं काम करतोय. बाळासाहेबांचे विचार पूर्ण राज्यभरात पोहोचवण्याचे काम आपण करतोय. मी पूर्ण वायकर कुटुंबाचे स्वागत करतो. वायकर यांनी मला त्यांच्या मतदारसंघातील समस्या सांगितल्या आहेत,” असे शिंदे म्हणाले.