– हिमांशू
‘ध’चा ‘मा’ मुद्दाम केला काय किंवा चुकून झाला काय, अर्थाचा अनर्थ होणं आणि त्यातून एखाद्या वेळी नको ते घडणं अपेक्षितच असतं. त्यामुळे जेव्हा एखादा मजकूर गंभीरपणे, जबाबदारीने छापील स्वरूपात लोकांसमोर ठेवायचा असतो, तेव्हा शब्द लिहिले गेल्यापासून प्रसिद्ध होईपर्यंतच्या प्रक्रियेत ‘प्रूङ्गरीडिंग’ अर्थात मुद्रितशोधन ही महत्त्वाची पायरी मानली जाते. मजकूर भाषांतरित असेल, तर जोखीम आणखी वाढते. परंतु आता बर्याच ठिकाणी भाषांतरही यांत्रिक पद्धतीनं केलं जात असल्यामुळे काय-काय चमत्कार घडतात, हे आपण पाहतोच. अशाच एका मजकुरात ‘लोण’ या मराठी शब्दाचं इंग्रजी भाषांतर ‘पिकल’ असं केल्याचं वाचायला मिळालं.
मुंबईत जेव्हा एल्ङ्गिन्स्टन रोड रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती, त्यानंतर प्रवाशांना आणि पादचार्यांना उद्देशून ज्या सूचना रेल्वेच्या जिन्याच्या पायर्यांवर लिहिल्या गेल्या, त्या अनेकांना आठवत असतील. एक हिंदी सूचना तर ‘एका वेळी एकच पाऊल उचला’ अशी होती. सामान्य माणूस सहसा चालताना एका वेळी एकच पाऊल उचलतो, हे गृहित धरलं तर ही सूचना चिमण्यांसाठी होती का, असा प्रश्न पडतो. पण तो यांत्रिक भाषांतराचा दोष होता, हे खूप विचार केल्यावर समजलं. ‘स्टेप’ या इंग्रजी शब्दाचं भाषांतर ‘पायरी’ऐवजी ‘पाऊल’ केल्यामुळे गोंधळ उडाला असावा.
चुकीच्या छपाईमुळे अर्थाचा अनर्थ होण्याची ताजी घटना तमिळनाडूमधली आहे आणि त्याचा ङ्गटका दुसर्या-तिसर्या कुणाला नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना बसलाय. तमिळ जनता मुळातच भाषाभिमानी. त्यांच्यापुढे हिंदीची डाळ शिजत नाही. एकतर तमिळ किंवा इंग्रजी, असा त्यांचा आग्रह असतो. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तर भलते कडवे. पण त्यांनी इंग्रजीत आपल्या नेत्यासाठी जो बॅनर बनवला, त्यात अतिउत्साह आणि अज्ञानाचं असं कॉम्बिनेशन झालं, की स्टालिन यांना खूपच लाजल्यासारखं झालं असणार.
स्टालिन हे ‘तमिळनाडूचा स्वाभिमान’ आहेत, असं कार्यकर्त्यांना म्हणायचं होतं. ही टॅगलाइन कार्यकर्त्यांनी मोठ्ठ्या निळ्या अक्षरात इंग्रजीतून छापली- ‘प्राइड ऑङ्ग तमिळनाडू’! परंतु बॅनरच्या छपाईपूर्वी डिझाइनचं प्रूङ्गरीडिंग करायला ते विसरले आणि ‘प्राइड’ या शब्दाची सुरुवात ‘पी’ या अक्षराने न होता ती ‘बी’ या अक्षराने झाली… मग स्टालिन ठरले ‘ब्राइड ऑङ्ग तमिळनाडू’! चेन्नईच्या मुख्य रस्त्याकडेला हे पोस्टर पाहून स्टालिन यांना काय वाटलं असेल? त्यात चुकीला प्रसिद्धी अधिक मिळते. राष्ट्रीय माध्यमांनी या चुकीची गंभीर दखल घेतली आणि बघता-बघता देशभर बातमी पोहोचली.
प्रत्येक शब्द जपून वापरावा, शब्द म्हणजे शस्त्र असतं, असं आपल्याला सांगितलं जातं. राजकारणाच्या ‘तोंडी’ भाषेतून हे सुविचार कधीच हद्दपार झालेत. कुणीही, कुणालाही, काहीही म्हटलं तरी आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती आहे. परवाच कुणीतरी कुणालातरी ‘गाढव’ म्हटलं. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसं संपूर्ण प्राणिसंग्रहालय नेत्यांच्या जिभेवर मुक्कामाला येईल. खरं तर बोलण्यापूर्वीही ‘प्रूङ्गरीडिंग’ व्हायला हवं; पण यापुढे ते शक्य दिसत नाही. मग किमान लिहिण्या-छापण्यापूर्वी तरी ते व्हावं, एवढी अपेक्षा का बाळगू नये?