आणखी 15 दिवस होणार आवक, तर कर्नाटक हापूस 15 जूनपर्यंत येणार
पुणे – रत्नागिरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आंब्यांची आवक घटत चालली आहे. पुढील 15 दिवस आंब्यांची आवक सुरू राहिल. तर, कर्नाटक हापूसची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, दि.15 जूनपर्यंत आंब्याचा हंगाम सुरू राहिल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दोन्ही प्रकारच्या हापूस आंब्याच्या पेटीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत अल्पशी घसरण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रत्नागिरी आंब्याविषयी व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, “मागील आठवड्याच्या तुलनेत आंब्याची आवक घटली आहे. गेल्या रविवारी (दि.19) येथील बाजारात 4 ते 5 हजार पेट्या आवक झाली. ती आज (रविवार, दि. 26) तीन ते साडेतीन हजार पेट्या झाली. कोकणातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून आंब्याची आवक होत आहे. जरी आवक घटली असली, तरीही भावात किंचितशी घसरण झाली आहे. गोड, दर्जेदार रत्नागिरी तयार हापूस बाजारात उपलब्ध आहे.
तर, कर्नाटक हापूसविषयी व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, “कर्नाटक हापूसची आवक स्थिर आहे. मागील आठवड्याप्रमाणेच रविवारी (दि. 19) 15 ते 16 हजार पेटी आवक झाली आहे. भावातही किंचित प्रमाणात घसरण झाली आहे. तरीही बाजारात सध्या कर्नाटक हापूसला अपेक्षित मागणी नाही. त्यापेक्षा केशर, दशहरा आणि स्थानिक हापूस खाण्यास नागरिक पसंती देत आहेत. परिणामी, या आब्यांना जास्त मागणी आहे.
घाऊक बाजारातील आंब्याचे भाव
रत्नागिरी हापूस (कच्चा) : 4-8 डझन 600 ते 1600 रु.
रत्नागिरी हापूस (तयार) : 4-8 डझन 1200 ते 2000 रु.
कर्नाटक हापूस (कच्चा) : 4-5 डझन 500 ते 800 रु.
कर्नाटक हापूस (तयार) : 4 -5 डझन 1000 ते 1400 रु.
पायरी : 4 डझन 400 ते 600 रु.आंबा आणि किलोचे भाव
लालबाग : 20 ते 30 रु.
बदाम : 20 ते 30 रु.
तोतापुरी : 20 ते 25 रु.
मलिका : 20 ते 30 रु.
केशर : 30 ते 50 रु.