औरंगाबाद – राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपचे सर्वच उमेदवार निश्चितच विजयी होतील, असा विश्वास भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. या निवडणूकीत आम्ही वेगळा डाव टाकणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने विचारपूर्वक विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत. यापूर्वी शतरंज के बादशहा देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजी खेळ खेळून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले. आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही. यावेळी आम्ही वेगळा डाव टाकणार आहे. कारण या तिन्ही पक्षांना आमचा डाव माहित झाला असून ते आता त्याच रस्त्याने जाणार आहे.
त्यामुळे यावेळी आम्ही वेगळा मार्ग काढू आणि यावेळी सुद्धा आम्ही आमचे विधानपरिषदेचे सर्व उमेदवार निवडून आणू असं दानवे म्हणाले. फक्त एकनाथ खडसे यांचाच नाही तर तिन्ही पक्षांचा पराभव करण्याचा आमचा डाव आहे. आम्ही केवळ कुणा नावाच्या वक्तीला नाही तर पक्षाला हरवणार आहोत. खडसे यांना उमेदवारी देऊ नयेत असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिला नव्हता, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न असल्याच सुद्धा दानवे म्हणाले.