#RanjiTrophy2024 #MUMvTN #SemiFinal2 : मुंबई विरुद्ध तामिळनाडू दुसरा उपांत्य सामना मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मैदानावर खेळला गेला आणि तीन दिवसांत संपला. मुंबई संघाने रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईने विक्रमी 48व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला. या रणजी मोसमात मुंबईच्या रूपाने पहिला फाइनलिस्ट मिळाला आहे. मुंबईने ग्रुप स्टेजमधील 7 पैकी 5 सामने जिंकले. याशिवाय 1 सामना हरला आणि 1 सामना अनिर्णित राहिला.
रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने बिहारचा एक डाव आणि 51 धावांनी पराभव करत स्पर्धेत शानदार सुरुवात केली. यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशविरुद्ध गटातील दुसरा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचप्रमाणे तिसऱ्या सामन्यात त्यांनी केरळचा 232 धावांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर उत्तर प्रदेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात त्यांना पत्करावा लागला होता. त्यानंतर पुढे जात त्यांनी पाचव्या सामन्यात बंगालचा एक डाव आणि 4 धावांनी पराभव केला. त्यानंतर छत्तीसगडविरुद्ध खेळलेला सहावा सामना अनिर्णित राहिला. यानंतर मुंबईने गटातील सातवा आणि शेवटचा सामना आसामविरुद्ध एक डाव आणि 80 धावांनी जिंकला.
त्यानंतर बडोद्याविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. यानंतर उपांत्य फेरीत तामिळनाडूचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मुंबई संघाने 48व्यांदा रणजी फायनलमध्ये प्रवेश केला असून हा संघ 41वेळा चॅम्पियन बनला आहे.
गेल्या मोसमात सौराष्ट्रने मारली होती बाजी…
यापूर्वी सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगाम जिंकला होता. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने अंतिम फेरीत मनोज तिवारीच्या नेतृत्वाखालील बंगालचा 9 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट याला जेतेपदाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.