मुंबई : अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा अखेरमुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत त्यांच्या खारच्या निवासस्थानी पोहचले आहेत. दरम्यान, राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र तरीही राणा दाम्पत्य मुंबईत आल्याने सध्या वातारण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केले जाईल, असे राणा दाम्पत्याने सांगितले आहे . या दोघांसोबतच युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही मुंबईत पोहोचले आहेत. सकाळी रस्ते मार्गाने हे कार्यकर्ते मुंबईत आल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिक आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून बडनेरा रेल्वे स्टेशनवर हजर राहणार होते. सोशल मीडियाद्वारे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आज रात्री आठ वाजता अमरावतीहून मुंबईला निघणार होते. परंतु राणा दाम्पत्य आज पहाटेच मुंबईत दाखल झाले आहेत.
दरम्यान, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे वाचन करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्री या त्याच्या खासगी आणि वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानची सुरक्षाही वाढवली आहे.