राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – शहराजवळ अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असून काही बांधकामावर चोरून वीज वापरण्यात येत आहे. बिल्डर, ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातील संबंधामुळे वीज चोरी होत असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र महावितरणकडून वाढीव वीज बिल देत पिळवणूक केली जात आहे.
राजगुरूनगर शहरात अनेक बांधकामे सुरु आहेत काही बांधकामे अधिकृत आहेत तर अनेक बांधकामे अनधिकृत आहेत. याकडे नगरपरिषदेसह संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष आहे. परवानगी न घेतात अनेक बांधकामे होत आहेत काही झाली आहेत. तालुक्याची राजधानी व पुणे, मुंबई, नाशिक शहराला जवळचे शहर म्हणून राजगुरूनगरसह चाकण आणि आळंदी शहराला कामगार, नागरिक उद्योजक यांची मोठी पसंती आहे.
त्याच प्रमाणात सदनिका बांधल्या जात आहेत. मोठ्या मोठ्या इमारती या शहरांमध्ये उभारल्या जात आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या जात नाही परवानगी व्यतिरिक बांधकामे केली जात आहेत तर बांधकाम करताना चोरून वीज वापर केला जात आहे.
राजगुरूनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सूरु आहेत या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात काही व्यावसायिक चोरून वीज वापरात आहेत. बांधकाम असलेल्या जागेजवळून जाणार्या विजेच्या खांबावरित तारांवर आकडे टाकून वीज घेतली जाते. याकडे महावितरणच्या अधिकार्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
मात्र सर्व त्रास सर्वसामान्यांच्या माथीच
खेड तालुक्यात एकूण होणार वीज वापर आणि ग्राहक यांच्या युनिट वापर किती आणि प्रत्यक्षात वापरात आलेली वीज किती यात मोठी तफावत असल्याने ही तूट भरून काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकच्या माथी वीज चोरी झालेले युनिट आकार लावला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी आकडे टाकून वीज वापरली तर महावितरण त्यांच्यावर गुन्हे दाखल करते. वीज वापरापोटी रक्कम दंड स्वरूपात वसूल करते; मात्र अनधिकृत बांधकामे आणि इतर बांधकामासाठी मीटर न घेता चोरून वीज वापरली जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये महावितरण अधिकार्यांबाबत नाराजी आहे.