मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाण्यातील ‘उत्तर सभेत राज ठाकरे यांनी चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. सध्या राज्यातील राजकारण या सभेनंतर चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांवर आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडूनही प्रतिउत्तर दिले जात आहे.
यातच या सभेवरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.रामदास आठवले म्हणाले, आपल्या भारतात भोंगे अनेक वर्षांपासून आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा मंदिरात मंदिरात भोंगे लावावे. मात्र भोंगे लावण्याच्या मुद्यावरून दोन धर्मात तणाव निर्माण करु नये.
आठवले पुढे म्हणाले,’राज ठाकरे यांनी अनेक वेळा भूमिका बदलली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचा रंग बदलला. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. मात्र आपल्या देशात लोकशाही आहे. आपल्या देशात पेशवाई नाही, हे लक्षात ठेवावे. तुम्हाला भोंगे लावायचे तर लावा, असंही रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचा भोंगे काढण्याला विरोध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहे. अशी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर नागपुरात पत्रकरांशी बोलतांना केली.