खेड (वार्ताहर) – लोकांच्या मनात काय चाललंय? हे मी रोज बघतोय, ऐकतोय. लोकांची मन जिंकण्यासाठी खूप मोठं मन लागतं. आमदारांच्या निवडणुकीत30 आमदारांनी मते मला दिलीत अन् सर्वाधिक मतांनी मी निवडून आलोय, मग याला काय मागचं दार म्हणतात का? असा टोला रोहित पवारांचे नाव न घेता आ.राम शिंदे यांनी लगावला. आता लोकं विचार करतात की, सन 2024 ला निवडणूक झाल्यावर काय होईल? माझं तर म्हणणं आहे आत्ताच निवडणूक होऊद्या, मी राजीनामा देतो अन् तुम्हीही राजीनामा द्या, असे खुले आव्हानच आ.रोहित पवारांना दिले.
गणेशवाडी (ता.कर्जत) येथील हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी असलेल्या काल्याच्या कीर्तनात आ.रोहित पवारांनी केलेल्या ‘मागच्या दाराच्या’ टीकेला आमदार राम शिंदे यांनी उत्तर दिले. शिंदे पुढे म्हणाले, विधानसभेत पाणंद रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाला आणि पुन्हा सर्वजण कामाला लागले. आपल्या कामाचा दर्जा चांगलाय.त्यामुळे अडीच वर्षात कुठलीही चौकशी लागली नाही. महाराष्ट्रात शेतकर्यांचे काम करण्याचं भाग्य मला मिळालं.
कुठल्या चौकशीला घाबरलो नाही. चौकशीला सामोरे गेलो. चौकशीत कुठंही काहीही निष्पन्न झालं नाही. भाषणात बोलायचं वेगळं, करायचं वेगळं, फेसबुकला टाकायचं वेगळं, व्हॉट्अपला वेगळं, माणसाला गंडवायचं वेगळंच, असा धंदा आपण कधी केलाच नाही, असा टोला लगावला. लोकं हीच माझी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या मागे ईडी लागत नाही आणि सीबीआय लागत नाही, अशी कोपरखळी रोहित पवारांचे नाव न घेता मारली. गणेशवाडीच्या ग्रामस्थांनी विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल सत्कार केला.सत्तेत असताना राम शिंदे यांनी भरीव निधी दिला आहे.आता यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष सुनील गावडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे, तात्यासाहेब माने, गणेश पालवे, करमनवाडीचे सरपंच भरत पावणे, विलास कायगुडे, माजी सरपंच संजय कायगुडे, कल्याण दतीर, नवनाथ पाडुळे, शरद पावणे, नानासाहेब दूरगुडे, संतोष श्रीराम, सुभाष ठोंबरे, संतोष पाडुळे, रामभाऊ कायगुडे, सुभाष करे, बाबासाहेब कायगुडे, कल्याण कायगुडे, जिजाबापू पाडुळे हे उपस्थित होते.