अयोध्या – येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी ज्या 62 कोटी राम भक्तांनी राम मंदिराला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाठिंबा दिला होता, त्यांच्यापर्यंत श्रीरामाचा प्रसाद पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या 45 संघटनात्मक प्रांतांचे विशेष अधिकारी 4 नोव्हेंबरपर्यंत अयोध्येला पोहोचतील.
5 नोव्हेंबर रोजी ते अयोध्येतून प्रभू रामाचा प्रसाद म्हणून अखंड कलश घेऊन त्यांच्या प्रांताकडे रवाना होतील. हा “अखंड प्रसाद’ प्रांत ते विभाग, विभाग ते ब्लॉक आणि शेवटी राम भक्तांच्या घरी पोहोचवला जाईल. याद्वारे देशातील पाच लाख गावांपर्यंत पोहोचून राम मंदिराच्या उद्घानाच्या दिवशी पूजा-अर्चा करून सर्वांना त्या कार्यक्रमाशी जोडायचे आहे.
“अक्षत कलश’ कार्यक्रमात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्रेही असतील. परिसरातील मान्यवरांना देऊन त्यांचा उद्घाटन कार्यक्रमात सहभाग निश्चित केला जाईल.
उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचणे अपेक्षित असल्याने राम मंदिर ट्रस्ट आणि विहिंपने लोकांना अयोध्येला न जाता त्यांच्या स्थानिक मंदिरात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीदरम्यान लोकांकडून योगदान गोळा करण्यासाठी 44 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
या कार्यक्रमात देशातील 13 लाख गावांतील 62 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात विहिंपला यश आले. याशिवाय, राम मंदिराच्या आंदोलनापासून सुरुवात करून, इतिहासाच्या विविध कालखंडात लाखो लोकांनी मंदिर उभारणीत आपली भूमिका बजावली होती. राम मंदिराच्या उद्घाटनात या सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.