मुंबई – राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी दिली नव्हती. यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिक आणि देशमुख यांनी केली आहे.
या याचिकेवर आता उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही नेते तुरुंगात असल्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता.
विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्यात यावा ,अशी मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.
दोघांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी करण्यात येत आहे. परंतु आजच्या कोर्टाच्या कामकाजात सुनावणी होउ शकली नाही. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी सकाळीच घेण्यात यावे, असे निर्देश न्यायमूर्ती एन. जमादार यांनी दिले आहेत.