रत्नागिरी – बारसू प्रकल्पाच्या वाढत्या वादानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदीचा आदेश देण्यात आला आहे. रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ प्रदर्शित करण्याबाबतही बंदी घालण्यात आली आहे. 31 मे पर्यंतही बंदी राजू शेट्टी यांच्या घालण्यात आली आहे. रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी आणि रत्नागिरी पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटिस बजावली.
महाराष्ट्रात सध्या कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा गोंधळ सुरु आहे. या रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध केला आहे. आजही सुरू असणाऱ्या रिफायनरी प्रकल्प सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली. त्यांच्या प्रतिनिधींनी प्रकल्पस्थळी जाऊन प्रकल्पास विरोध केला.
या पार्श्वभूमीवर ही नोटिस राजू शेट्टी यांना बजावण्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचे म्हणत रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली आहे. तसेच सोशल मीडियावर बारसू प्रकल्पाबाबत पोस्ट केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
‘शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम सरकार करत आहे’
मात्र अशा नोटीशींना मी भीक घालत नसून शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट सांगितले. तसेच काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम सरकार करत आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कांवर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागले आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.