नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे सर्व दलांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक घेतली. त्या बैठकीत चिनी सैन्य माघारीच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला.
चिनी कुरापतींमुळे सीमेवर म्हणजेच प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) तब्बल आठ आठवडे तणावाची स्थिती होती. अखेर चीनने नरमाईची भूमिका घेत संघर्ष झालेल्या गलवान खोरे परिसरातून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली. त्याचा आढावा घेण्यासाठी राजनाथ यांनी बैठक घेतली. संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, नौदलप्रमुख करमबीर सिंग आणि हवाई दलप्रमुख आर. के. एस. भदौरिया बैठकीला उपस्थित राहिले.
भारत आणि चीनमध्ये झालेल्या सहमतीनुसार पहिल्या टप्प्यात गलवान खोरे, गोग्रा, हॉट स्प्रिंग्ज आणि फिंगर 4 भागांमधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा तपशील नरवणे यांनी बैठकीत दिला. त्यांनी पूर्व लडाखबरोबरच एलएसीलगत असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीमच्या भागांमधील स्थितीची माहितीही दिली. संभाव्य धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
अमेरिकी संरक्षणमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा
राजनाथ यांनी दूरध्वनीवरून अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क टी. एस्पर यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेच्या पुढाकारातून ती चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेतील संरक्षण-सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर चर्चेत भर देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, लडाखमधील स्थितीवरही राजनाथ आणि एस्पर यांच्यात चर्चा झाली. चीनच्या आगळिकींमुळे सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर भारताच्या पाठीशी अमेरिका ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळेही राजनाथ आणि एस्पर यांच्यातील चर्चेचे महत्त्व वाढले आहे.