लखनौ – आपण कधीही आक्रमक नव्हतो, मात्र शत्रुत्वाचा हेतू असलेल्या कोणत्याही राष्ट्रापासून आपल्या लोकांचे रक्षण करण्यास सज्ज आहोत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्थापन केलेले चाचणी केंद्र तसेच ब्रह्मोस उत्पादन केंद्राची पायाभरणी राजनाथ सिंह यांनी आज केली.
त्यावेळी ते बोलत होते. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेमध्ये संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन क्लस्टर्सच्या विकासाला गती देण्यासाठी सुमारे 22 एकरांवर अशा प्रकारचे पहिले संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र उभे केले जात आहे.
ब्रह्मोस एरोस्पेसने घोषित केलेले ब्रह्मोस उत्पादन केंद्र हे 200 एकर क्षेत्रावर उभारण्यात येईल आणि नवीन ब्रह्मोस-एनजीच्या पुढच्या श्रेणीचे स्वरूप तयार करेल. हे नवीन केंद्र पुढील दोन ते तीन वर्षांत तयार होईल आणि दरवर्षी 80-100 ब्राह्मोस-एनजी क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू करेल.
ब्रह्मोस स्वनातीत जहाज क्षेपणास्त्र प्रणालीचा उद्देश प्रतिरोधक म्हणून काम करणे हा आहे, ही प्रणाली केवळ भारत आणि रशियामधील तांत्रिक सहकार्याने केली जात आहे. 21 व्या शतकात भारताची विश्वासार्ह प्रतिरोधक सामर्थ्य बळकट करणारे ब्राह्मोस हे जगातील सर्वोत्तम आणि वेगवान अचूक- गायडेड क्षेपणास्त्र असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.