दिर्घ प्रतीक्षेनंतर आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी एकूण 36 आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी पहिल्यांदाच आमदार झालेल्या काही आमदारांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकले देखील. आज या तिघांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. या मंत्रीमंडळातील काही वैशिष्टये पुढील प्रमाणे ः
1. एकाच घरात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद – शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहात आहेत. आज त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
2. पहिल्यांदा आमदार आणि थेट मंत्री झालेले नेते – शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे हे तिघेजण पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. तिघांनाही मंत्रीपद मिळाले आहे.
3. मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुले : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख या दोघांनी आज मंत्रीपदांची शपथ घेतली. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपददेखील भूषवले आहे.
4. मंत्रिमंडळात तीन महिला मंत्री – उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात फक्त तीन महिला आमदारांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीने आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपावलं आहे. शिवसेनेकडून मात्र एकाही महिला आमदाराला मंत्रिपद दिलेले नाही.
5. 40 दिवसांत दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अवघ्या 40 दिवसांत दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 23 नोव्हेंबर भाजपने राज्यात सत्तास्थापन केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार केवळ तीनच दिवसच कोसळले. त्यानंतर अजित पवारांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
6. सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री असलेले मंत्रीमंडळ – 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी सात मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. दरम्यान, 17 दिवस हे सात मंत्री बिनखात्याचे मंत्री होते.
8. तब्बल 32 दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सहा नेत्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रीपदांची शपथ घेतली होती. त्यानंतर तब्बल एक महिना दोन दिवसांनी (32 दिवसांनी) आज (30 डिसेंबर) मंत्रीमंडळाचा विस्तार झाला.
9. 13 जिल्ह्यांना एकही मंत्रीपद नाही – सोलापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, परभणी, उस्मानाबाद, धुळे, हिंगोली, वाशिम, अकोला, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यांना एकही मंत्रीपद मिळाले नाही. दुसरीकडे मंत्रीमंडळात मुंबईतल्या 6 नेत्यांना, तर कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगरच्या प्रत्येकी 3 आमदारांना स्थान देण्यात आले आहे.
10. उस्मानाबादचे तीन जावई मंत्रीमडळात – मंत्रीमंडळात उस्मानाबादच्या एकाही आमदाराला संधी मिळाली नाही. मात्र उस्मानाबादचे तीन जावई मंत्रीमंडळात आहेत. उस्मानाबादमधील तेर हे गाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे माहेर आहे. राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे हे उस्मानाबादच्या उपळा या गावचे जावई आहेत. उस्मानाबादमधील ढोकी हे गाव राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांची सासरवाडी आहे. त्यामुळे तीन जावयांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्याचा उस्मानाबादकरांना आनंद आहे.
11. एकाच मंत्रीमंडळात मामा-भाचे – राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे दोघे मामा-भाचे आहेत. या दोघांचाही मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.