चेन्नाई – तामिळनाडुतील दिवंगत ज्येष्ठ समाज सुधारक पेरियार यांनी काही दशकांपुर्वी एक रॅली काढली होती. त्या रॅलीत प्रभु रामचंद्र आणि सीता यांचा अवमान करण्याचा प्रकार घडला होता त्यावरून पेरियार यांच्यावर टीका करणारे वक्तव्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केले होते. या प्रकरणी त्यांनी माफी मागावी अशी मागणी एका दविडी संघटनेने केली आहे. पण याविषयावर माफी मागण्यास अथवा आपले वक्तव्य मागे घेण्यास रजनीकांत यांनी नकार दिला आहे.
त्यांनी आज आपली बाजू मांडताना त्या रॅलीविषयी त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये आलेली छायाचित्रे पत्रकारांना दाखवली. या छायाचित्रात प्रभु रामचंद्र आणि सीतामाईंचा अवमान करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हे प्रकार पाहिल्यानंतर आपण केलेले वक्तव्य चुकीचे नव्हते आणि त्याविषयी आपण माफी मागणार नाही असे त्यांनी आज पत्रकारांना सांगितले. आपण जे काही वक्तव्य केले आहे ते काल्पनीक नव्हते किंवा जे घडलेच नाहीं त्यावर आपण बोललो नव्हतो. आपण जे बोललो ते खरेच आहे.
1971 साली काढण्यात आलेल्या या रॅलीच्यावेळी हिंदु देवदेवतांची विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्त केली आहे. या रॅलीवरून रजनीकांत यांनी 14 जानेवारीला झालेल्या एका कार्यक्रमात पेरीयार यांच्यावर टीका केली होती. पेरियार यांच्यावर टीका करणारे वक्तव्य रजनीकांत यांनी केल्याने पेरियार समर्थक संघटनेने त्यांच्याकडून माफीची मागणी केली होती. डीव्हीके या संघटनेने रजनीकांत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे.