जयपुर – राजस्थानातील मंत्रिमंडळात संपुर्ण फेरबदल करण्यात आला असून यात पंधरा नवीन चेहेऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री आहेत. या फेरबदलाबद्दल कॉंग्रेसचे गहलोत विरोधी नेते सचिन पायलट यांनी पुर्ण समाधान व्यक्त केले आहे.
पायलट यांच्या पाच समर्थक आमदारांनाहीं मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. या प्रक्रिये संबंधात बोलताना पायलट यांनी म्हटले आहे की राजस्थानातील निवडणुका आता केवळ 22 महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला पक्षाला नवचैत्यन देऊन पुढील निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हे काम मंत्रिमंडळ विस्तारामुळे सोपे झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे. पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की पक्षात गटबाजी असल्याचा निष्कर्ष पत्रकार मंडळीच काढत असतात पण अशी कोणतीही गटबाजी आमच्यात नाही. कॉंग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे करीत आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली सामान्य सदस्य म्हणून काम करीत आहोत. हाच आमचा गट आहे या खेरीज आमच्याकडे कोणताही गट नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.
काही महिन्यांपुर्वी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री गहलोत यांच्या विरोधात बंड करून सरकार जवळपास पाडले होते. परंतु गेहलोत यांच्या हुशारीमुळेच केवळ हे सरकार वाचले आणि पायलट हे पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यांनी आता भाजपच्या विरोधात जोरदार कंबर कसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.