जयपूर – राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजप आपल्याच लोकांच्या संघर्षात वेढलेला दिसत आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा शनिवारी चुरू जिल्ह्यातील सालासर मंदिरात वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या युवा मोर्चातर्फे परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारच्या निषेधाचे आंदोलन करण्यात येत आहे.
सर्व आमदारांना धरणे यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांसाठी “इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. आमदार आणि कार्यकर्ते या संभ्रमात आहेत की त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे की आजही गर्दी खेचणाऱ्या वसुंधरा राजे यांच्या वाढदिवसाला हजेरी लावावी? या गोंधळामुळे भाजपमधील गटबाजी आणखी वाढली आहे.
राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होत असल्याने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे अचानक सक्रीय झाल्या आहेत. म्हणून त्यांनी चुरू या त्याच्या गावी वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.
राजे, दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या असून आजही राजस्थान भाजपामध्ये त्या लोकप्रिय आहेत आणि एकहाती निवडणूक फिरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे मानले जाते. आगामी निवडणुकीत पक्षाने कोणताही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सादर न करण्याचा निर्णय घेतला असला तरी वसुंधरा राजे यांचे समर्थक त्यांना या पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून पाहतात, हे वास्तव पक्षश्रेष्ठींनाही ज्ञात आहे.
वसुंधरा राजे यांच्या गटाने मात्र वाढदिवसाची पार्टी म्हणजे शक्तीप्रदर्शन असल्याचे नाकारले. गेल्या दोन वर्षांपासून वसुंधरा आपला वाढदिवस पक्ष कार्यकर्त्यांसोबत साजरा करत आहेत, असा त्यांचा दावा आहे. चुरूचे भाजप खासदार राहुल कासवान म्हणाले की वसुंधरा या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत आणि तरुण मतदार त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना राजेंचा वाढदिवस साजरा करायचा आहे. दोन वर्षांपूर्वी वसुंधरा राजेंनी भरतपूर येथील गोवर्धनजी येथे वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी तो केशोराईपाटन होता आणि यावर्षी सालासरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांना भेटायचे आहे.
मात्र, या कार्यक्रमावर संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या युवा शाखेने परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला वसुंधरा राजे यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारे राज्य भाजपचे प्रमुख सतीश पुनिया आणि विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र सिंह राठोड हे संबोधित करतील. एकाच दिवशी आलेले दोन्ही कार्यक्रम म्हणजे पक्षातील कोणत्याही प्रकारच्या सत्तासंघर्षाचे संकेत नसल्याचे राठोड म्हणाले.
एखाद्या नेत्याने तिचा वाढदिवस साजरा केला तर त्यात गैर काहीच नाही. त्या दोनदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. पक्षात कुठलाही वाद नाही. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु असल्याने सर्व आमदार राजधानी जयपूरमध्ये आहेत, इतकेच.