कोल्हापूर – महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा देणारे राजर्षी शाहू महाराज हे कालातीत महापुरूष आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित “राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर (खंड-12)’ आणि “शाहू छत्रपती: राजा आणि क्रांतीकारक (खंड-13)’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत अनुक्रमे मद्रास विद्यापीठाचे डॉ. चंद्रा मुदलियार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एन. वैद्य यांनी दिलेल्या व्याख्यानांचा प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांनी अनुवाद केला. या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देशमुख बोलत होते.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी वि.रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला पुरोगामित्वाची दिशा दाखविली. त्यांना केवळ राज्यापुरते संकुचित करून चालणार नाही. जिथे जिथे वंचित, शोषितांची चळवळ सुरू आहेत, तिथे तिथे या महापुरूषांचे अस्तित्व असते. ते असले पाहिजे. वर्तमानात महापुरूषांच्या संदर्भाने दोन बाबी प्रकर्षाने घटताना दिसताहेत. एक तर त्यांचे मोठ्या प्रमाणात विभूतीकरण वा दैवतीकरण सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला अतिरेकी विकृतीकरण सुरू आहे. दोन्ही बाबी प्रत्येकजण आपापल्या कृती कार्यक्रमानुसार करत आहेत, हे गैरच आहे. वैचारिक प्रतिरोध आवश्यक असला तरी अशा टोकाच्या गोष्टी सामाजिक सौहार्दासाठी धोकादायक असतात.
राजर्षी शाहू महाराज हे विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या कालखंडात भारतीय संविधानामधील तत्त्वांची अंमलबजावणी करणारे द्रष्टे व्यक्तीमत्त्व असल्याचे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संवैधानिक मूल्यांची आपल्या संस्थानात रुजवात करणारे शाहू महाराज एकमेव पूर्वसुरी होते. संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची असोशीने अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन त्यांनी दिलेच. शिवाय, संविधानातील बहुतांश मूलभूत अधिकार, निर्देशित तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने कृतीशील पावले उचलली. त्या दृष्टीने शाहू महाराज म्हणजे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरले, असे डॉ. देशमुख म्हणाले.