कोल्हापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 6 मे रोजी 100 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व वर्षभर साजरे करण्यात येणार असून या पर्वात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यात छत्रपती शाहू महाराजांनी ज्या-ज्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत अशा ठिकाणीही कार्यक्रम राबविण्यात येतील.
यातील काही कार्यक्रम सांस्कृतिक विभागाकडे दिले जातील. शाहू मिल व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्मृती- शताब्दी पर्वातील काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री म्हणाले, शाहू मिल स्मृती स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे ते म्हणाले.
राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारा जगातील एकमेव राजा, पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. स्मृती-शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना देऊन हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात राज्यातील नामवंत शेतकऱ्यांसाठी ऍग्रीकल्चर कार्यशाळा घेण्यात यावी. शाहू मिल काम आणि शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचे संरक्षण, शाहू चरित्रग्रंथ अभ्यासक्रमात समावेश, खासबाग मैदावार महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी स्पर्धाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
18 एप्रिल ते 22 मे या कालावधीत विविध उपक्रम
राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने 18 एप्रिल ते 22 मे या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या ‘कृतज्ञता पर्व’ दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात पोवाडा, संगीत, मर्दानी खेळ, चित्ररथ, व्याख्याने, प्रदर्शन, असे व इतर विविध उपक्रम राज्यभर आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाईल.
राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबा यात्रेनंतर छत्रपती ताराराणी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथोत्सवाची सुरुवात केली होती. याच दिवशी या उपक्रमाला सुरुवात करून सर्व वारसास्थळे आणि इतर वास्तूंची स्वच्छता मोहीम, नाम फलकांचे अनावरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा, विचारांचा, दृष्टीकोनाचा परिचय करुन देण्यासाठी दिनांक 5 मे रोजी एकाच वेळी शंभर ठिकाणी शंभर वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे.