पुणे – चिंचवड आणि कसाब विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच पार पडणार आहे. या उद्देशाने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपने दोन्हही ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून आहे. अशात पुणे दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे ठाकरेंनी चिंचवड आणि कसबा विधानसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हटलंय ठाकरेंनी नेमकं पत्रात
महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा. अशा आशयाचे पत्र राज ठाकरेंनी लिहिले आहे.
जाहीर आवाहन… pic.twitter.com/lDCH44tnk7
— Raj Thackeray (@RajThackeray) February 5, 2023
या पत्राद्वारे राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण देखील करून दिली आहे. यासोबतच पोट निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. अशात आता महाविकास आघाडी ठाकरेंच्या या पत्राला नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.