मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले असून, 2 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल जायीर करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली. तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही सत्यजित तांबे यांनी मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. यावेळी सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली आहेत.
त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, पक्षाने त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, पक्षातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हंटलं आहे.
तांबे यांच्या आरोपावरील प्रतिक्रियेसाठी पटोले उपलब्ध झाले नाहीत, मात्र पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तातडीने तांबे यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. तांबे यांना योग्य एबी अर्ज दिले होते. त्याच्या नक्कल प्रती आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मात्र याबाबत विजय वडेट्टीवार गंभीर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “तांबे यांच्या बाबतीत झालेला प्रकार गंभीर असून त्याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत पक्षाच्या वतीने रविवारी खुलासा केला जाईल’, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेमकं सत्यजित तांबे काय म्हणाले….
मी सुरुवातीपासून पक्षाकडे पद किंवा काही तरी जबाबदारी मागितली. मात्र मला पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी सांगितलं की तुम्ही वडिलांच्या जागी प्रयत्न करा. त्यानंतर कार्यकर्त्यांचा रेटा पाहून वडिलांनीच माघार घ्यायचं ठरवलं. त्यानुसार मी अर्ज सादर भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी यावेळी केला.