पुणे – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालात कोर्टाने महत्त्वपूर्ण विषयांवर निरीक्षण केले आहे. शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून शिंदे गटाचा पाठिंबा असणारे भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. याशिवाय शिंदे गटाचे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा स्थापन करता आले असते, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. यावर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. अशात या निर्णयावर सिनेसृष्टीतील फार कमी कलाकारांनी आपलं मत व्यक्त केलं मात्र लोकप्रिय अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी थेट शब्दात आपली बाजू मांडली आहे.
महाविकास आघाडीचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट करत शिंदे-फडणवीस सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या पोस्टवर अभिनेत्री सिमी गरेवाल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सिमी यांनी लिहिलं, ‘काळजीचं कारण नाही, आता पुढील जबाबदारी आपल्यावर आहे, महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर केलेला हा बेकायदेशीर कब्जा नक्कीच हटवेल.’ त्यांनी थेट कमेंट करत शिंदे सरकारला पाडण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
सध्या या प्रतिक्रियेची चर्चा सर्वत्र होत आहे.