मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन संपूर्ण देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. कारण उत्तर प्रदेशातील भाजपकडून राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाविषयी खेद व्यक्त केला होता,” असा दावा साध्वी कांचनगिरी यांनी केला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत दाखल झालेल्या साध्वी कांचनगिरी यांनी हा दावा केला.
एकीकडे राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. तर त्यांच्या पत्रकार परिषदेत पोहोचलेल्या साध्वी कांचनगिरी यांनी राज ठाकरेंनी खेद व्यक्त केल्याचे सांगत त्यांना आपण माफ केल्याचे म्हटले आहे.
“चार महिन्यांपूर्वी मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यांनी मला बोलावलं आणि मानसन्मान दिला. मी त्यांना विचारलं की तुम्ही जे उत्तर भारतीयांसोबत केलं ते योग्य होतं का? त्यावर ते म्हणाले की माताजी आमची चूक झाली आहे. मी व्हिडीओ दाखवते. पत्रकार परिषद होती, तिथे सगळे पत्रकार उपस्थित होते. जर त्यांनी एका संताची माफी मागितली आहे. तर मी पण म्हणते की आपण त्यांना माफ करा आणि तुम्ही तिथे स्टेज तयार करा. माझं काम असेल ते येऊन आपली माफी मागतील आणि आपली चूक कबूल करतील,” असं साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान खासदार बृजभूषण यांना सांगितले . दरम्यान साध्वी कांचनगिरी यांच्या या दाव्यावर मनसेची भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.