मुंबई – राज ठाकरे यांच्यात उत्तरप्रदेशात जाण्याची हिंमत नाही, त्यांनी घाबरून आपला अयोध्या दौरा रद्द केला असा आरोप समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांनी दावा केला आहे. ते म्हणाले की ठाकरे यांच्या पक्षाने यापूर्वी महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरुद्ध हिंसक निदर्शने केली होती आणि त्यांनी पेरलेल्या द्वेषाला द्वेषाने उत्तर दिले जाण्याची स्थिती तिकडे निर्माण झाली होती. पण त्याला घाबरून राज ठाकरे यांनी आपला नियोजित दौराच रद्द केला आहे.
त्यांचे राजकारण आता संपले आहे असेही आझमी यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांच्या बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात हिंसक प्रकार केल्याने त्यांना अशीच प्रतिक्रीया मिळणार होती. या प्रतिक्रीयेला सामोरे जाण्याची धमक त्यांच्यात उरली नाही अशी टीकाही त्यांनी केली.