– घरात अगरबत्ती आणि धुपाचा वापर करा. घरातला कुबट आणि ओशट वास बराचसा कमी होईल. कपाटात नॅप्थॅलीन बॉल्स, कापराच्या वड्या ठेवल्याने आर्द्रता शोषली जाते. तसंच कडुनिंबाची सुकी पानं, लवंगा ठेवल्याने कुबट वास जातोच शिवाय जंतूप्रतिबंधही होतो.
– फर्निचर कोरडं राहील याची काळजी घ्या. कारण ओल आली आणि कायम राहिली तर बुरशी येऊ शकते आणि काही वेळेस ही बुरशी अगदी सूक्ष्म असते आणि ती दिसून येत नाही.
– दरवाजाच्या बाहेर आपण डोअरमॅट ठेवतो. ज्याच्यावर चपला घासून आपण घरात येतो. पण पावसाळ्यात घराच्या आतही एक पायपुसणं ठेवा ज्यावर पाय पुसल्यानंतर आपण बाथरूममध्ये पाय धुण्यासाठी जाऊ शकतो.
– पावसाळ्यात शक्यतो कारपेट्स वापरू नका. कारण ती ओली झाल्यास ती लवकर सुकत नाहीत. पावसामुळे पडदे ओले होऊ देऊ नका. कारण बऱ्याच पडद्यांना मागून अस्तर लावलेलं असतं. म्हणजे दोन कपडे सुकायला वेळ लागतो. म्हणून पडद्यांकडे विशेष लक्ष द्या. कारण पडदे मागून ओले झालेले कळून येत नाही.
– पावसाळ्यात वाळवीच्या प्रादुर्भावाचं प्रमाण वाढतं. कारण वाळवीच्या वाढीला ओल खूप पोषक असते. म्हणूनच एखाद्या “ऍण्टी-टर्माइट ट्रिटमेंट’ने आपण आपलं फर्निचर सुरक्षित ठेवा.
– आपलं इंटिरिअर सुरक्षित ठेवलंच पाहिजे. कारण फर्निचर खराब झालं तर पैशाचं नुकसान तर होईलच शिवाय घरातल्या सदस्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होऊ शकतो. ऍलर्जी, अस्थमा, श्वसन व त्वचा विकार असे बरेच आजार होऊ शकतात. म्हणूनच वर सांगितलेल्या साध्या, सोप्या उपायांनी आपण आपलं घर पावसाळ्यात सुरक्षित ठेवा आणि पावसाळ्याचा मनमुराद आनंद घ्या.