मंचर-आंबेगाव तालुक्यात रस्त्याच्या दुर्तफा गटार किंवा चर न खोदल्यामुळे जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली असून, त्यामुळे रस्त्यांचे नुकसान झाले आहे. रस्त्यांसाठी झालेला खर्च पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली आहे.
आंबेगाव तालुक्यात यावर्षी रस्त्यांची अनेक कामे झाली. यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला; परंतु कामे निकृष्ट झाल्याने पावसाने रस्त्यांची वाताहत झाली आहे. डांबरीकरण केलेल्या अनेक रस्त्याच्याकडेने चर खोदाई न केल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर आले. या वर्षात खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी डांबरी रस्त्यावर भेगा पडल्या आहेत.
साईडपट्टयाही वाहून गेल्या आहेत, त्यामुळे निधी वाया गेला आहे. काही रस्त्यांची कामे ही घाईगडबडीत पूर्ण करून मार्चपूर्वी बिले काढण्यासाठी प्रयत्न झाले आहेत, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चर खोदाई बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांचा विरोध व इतर गोष्टींमुळे खोदाई झाली नाही. या पावसामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करून घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.