मुंबई – राज्यासह अनेक भागांत पावसाने काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे पूर्व महाराष्ट्रामधील गडचिरोलीतील 128 गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पुढील चार दिवस दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. जून ते जुलै महिन्यात नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत राज्यात 67 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सध्यस्थितीत दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून, तेलंगणामध्ये रेड अलर्ट कायम आहे. शिवाय, कर्नाटक आणि केरळमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुंबईत कांजुरमार्ग, घाटकोपर तसेच रायगड व महाडमध्ये एनडीआरएफच्या प्रत्येकी एक अशा चार तुकड्या तैनात केल्या आहेत.
राज्याच्या अनेक शहरांना मुसळधार पावसाचा फटका असला आहे. पूर्व महाराष्ट्रामधील गडचिरोलीतील 128 गावांचा संपर्क तुटला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील सर्व जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. कोकणात 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी जिह्यातील जगबुडी व कोदवली नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
महाराष्ट्रासह तेलंगणातही हवमान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात. पावसाळ्यात कोणताही धोका पत्करू नये आणि अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.