औरंगाबाद: 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातून मान्सूनचे माघार घेतली असली तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या ठिकाणीही काल 16 ऑक्टोबर रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
औरंगाबाद शहरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. शहरासह वाळूज परिसरात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दौलताबाद, खुलताबाद, सोयगाव परिसरालाही रात्री अकरानंतर मध्यम ते मुसळधार पावसाचा फटका बसला. त्यामुळे मान्सून एकदाचा परतला म्हणत निःश्वास टाकलेल्या शेतकरी आणि नागरिकांना पुन्हा एकदा नव्या संकटाला सामोरे जावे लागले.
औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात काल रात्री दहानंतर पाऊस सुरु झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बरसात झाली. यामुळे औरंगाबाद शहराची तसेच खुलताबाद, दौलताबाद परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान मध्यरात्रीतून काही ठिकाणी पुरवठा सुरळीत झाला तर काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा खंडित झाले आहे. लोणीखुर्द परिसरात 17 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरु झाली. त्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही भागाला जवाद चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हवामान स्थिती बदलल्यामुळे या वादळानं दिशा बदलली. म्हणून महाराष्ट्रात तरी या वादळाचा फटका बसणार नाही, अशी चिन्हे होती.
मात्र बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा पश्चिम भाग, कोकण किनारपट्टी वगळता कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत या पावसाची तीव्रता वाढेल. या काळात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होत जाईल आणि त्यानंतर हळू हळू थंडीची सुरुवात होईल,