पुणे – पावसाअभावी शेतीपीकं वाळून जात आहेत. राज्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. उद्या मंगळवारी मराठवाडा, विदर्भात पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय.
मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा येलो अर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज राज्याच्या अनेक भागात हलक्या, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या आहेत.
दरम्यान, बुधवारी (दि. 6) विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाच्या मोठ्या खंडामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक भागातील शेतीपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पीके वाळून जात आहेत. येत्या काही दिवसांत जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. राज्यात कोरड्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे. तसेच अग्रीम पीक विमा देण्याची आणि चारा – छावण्या सुरू करण्याचीही मागणी होत आहे.