मुंबई -ऐन उन्हाळ्यात राज्यातील हवामान अचानक बदलल्याने राज्यातील अनेक भागांत आज दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील बुलढाणा, अमरावती आणि अकोल्यात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळ्यात सोसाट्याचा वारा सुटला असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी तीन वाजता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या तीन आठवड्यांपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले होते. परंतु गेल्या 24 तासांच्या आत राज्यातील हवामान अचानक बदलले.
आज सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने झपाट्याने उष्णता कमी झाली. दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटून पावसाने हजेरी लावली. विदर्भातील अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बुलढाण्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरासह गंगापूर आणि पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाल्यामुळं शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तीन जिल्ह्यांत गारपीटीचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात पुन्हा हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
====================