पुणे – राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील चांगलीच धांदल उडत आहे. यातच आता पुण्यासह विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
पुण्यात दुपारच्या वेळेस कडक ऊन जाणवते. मात्र संध्याकाळी जोरदार पाऊस होतो, असे काहीसे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. आजही दुपारच्या सुमारास पुण्यातील तापमान 30 अंश सेल्सियस राहणार आहे. तर पुढील काही दिवसात शहराचे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरमध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे तापमानात घट होणार असून नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. पुण्यासह विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बुलढाणा, जळगाव, नगर जिह्यांना बसला. एप्रिलमध्ये पावसाळी वातावरण बघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अनेक शेतक-यांनी सांगितले होते. या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचीही नासाडी झाली होती. पपई, खरबूज, टरबूज, आंबा, संत्री, कांदा पिकांचा अक्षरशः चिखल झाला होता. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर या पावसामुळे नुकसान होत आहे. यातच आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.