मुंबई: हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि रायगड परिसरात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.
हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील 103 दरडग्रस्त गावांना धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या स्थलांतरांचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
समुद्र, खाडीकिनारी राहण्याऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये दाखल झालेला मान्सून लवकरच विदर्भातही प्रवेश करणार आहे. 12 ते 14 जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या काळात मान्सून गडचिरोली, गोंदिया हा सारा परिसर व्यापेल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी वर्तविला आहे.