मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी बदली कर्णधार लोकेश राहुलला जबाबदारी धरले आहे. राहुलला रोहित शर्मा जायबंदी असल्याने कर्णधारपद दिले गेले आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वात कुठेही त्याची हुशारी दिसली नाही, स्पष्टच सांगायचे तर त्याचे नेतृत्व अत्यंत कुचकामी वाटले, अशा शब्दात गावसकर यांनी राहुलला फटकारले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा आणि रूसी वॅन दर दुसेन जेव्हा खेळपट्टीवर तग धरून उभे असताना राहुलने केलेले गोलंदाजीतील बदल अनाकलनीय होते. या फलंदाजांना रोखण्यासाठी राहुलकडे कोणतीही योजना नव्हती तसेच व्यंकटेश अय्यरला अष्टपैलू म्हणून जर संघात घेतले होते तर त्याला एकही षटक गोलंदाजी का दिली नाही हे देखील समजेनासे आहे, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारकडून स्लॉग ओव्हर्समध्ये जास्त षटके गोलंदाजी करून घेतली गेली पाहिजे होती. मात्र, 45 व्या षटकापूर्वीच त्यांचे स्पेल संपले होते. मधल्या षटकांत रवीचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांच्या जोडीला व्यंकटेश अय्यरचाही उपयोग करून घ्यायला हवा होता. दोन्ही फलंदाज स्थिरावण्यापूर्वीच शार्दुल ठाकूरला आजमावून पाहायला हवे होते. मात्र, अशी कणतीही योजना राहुलकडे असल्याचे जाणवले नाही, असेही गावसकर यांनी सांगितले.
डावातील अखेरच्या षटकात बुमराह आणि भुवनेश्वर सारखे अनुभवी गोलंदाज असते तर त्यांच्या धावांवर अंकूश राखता आला असता. अखेरच्या पाच-सहा षटकांसाठी त्यांना राखून ठेवायला हवे होते. राहुलच्या नेतृत्वाची ही सुरुवात आहे, पण त्याने विराट कोहली व रोहित शर्माकडून सल्ला घ्यायला हवा व त्यातून काहीतरी शिकायला हवे, असा सल्लाही गावसकर यांनी दिला.
भारताच्या एकदिवसीय सामन्यांच्या संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमधून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलकडे या तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.