नवी दिल्ली – करोना मुळे देशातील साऱ्याच अर्थव्यवस्थेची वाट लागली असून त्याचा सामान्य माणसांना मोठा फटका बसल्याने त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने मोठ्या आर्थिक सवलतींची घोषणा करणे ही काळाची गरज आहे असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. टाळ्या किंवा थाळ्या वाजवण्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांची किंवा छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांची मदत होणार नाही असा टोमणाहीं त्यांनी मोदींना उद्देशून मारला आहे. करोनाने आपल्या अर्थव्यवस्थेवरही मोठा आघात केला आहे. या लोकांना आर्थिक मदत किंवा करसवलती देण्याची गरज आहे. लोकांचे कर्जाचे हप्तेही मोठ्या प्रमाणावर थकणार आहेत, त्यापासूनही लोकांना काही तरी सवलती मिळण्याची अपेक्षा आहे. यावर तातडीने उपाययोजना करा अशी सुचना त्यांनी केंद्र सरकारला केली आहे.
देशभर करोनाची दहशत पसरल्याने साराच व्यापार उदीम थंडवला आहे. त्यातून रोजंदारीवर काम करणाऱ्यांची रोजी रोटी बुडाली असून अनेक पर्यटन आणि विमान कंपन्या डबघाईला येण्याच्या स्थितीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा राष्ट्राला उद्देशून जे भाषण केले त्यात काही तरी आर्थिक उपायोजना ते जाहीर करतील अशी अपेक्षा होती पण त्यात त्यांनी आर्थिक मदतीचे कोणतेही आश्वासन दिलेले नाहीं किंवा त्याची रूपरेषाही त्यांनी स्पष्ट केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवर तातडीने उपायोजना केली जावी अशी मागणी अनेक घटकांकडून केली जात आहे.