नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना उद्देशून खुले पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले. तसेच, शेतकऱ्यांच्या भविष्यातील लढ्यांसाठी कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राहुल यांनी खुले पत्र जारी केले. शेतकऱ्यांचा संघर्ष अजून संपलेला नाही. शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी), वादग्रस्त वीज सुधारणा कायदा मागे घेणे, शेती अवजारांवरील करबोजात कपात, डीझेल दरात घट, शेतकऱ्यांवरील कर्जाच्या बोजावर तोडगा आदी पुढील लढ्यांसाठी गंभीर मुद्दे आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
राहुल यांनी मोदींनाही इशारा दिला. शेतकऱ्यांना त्यांचा फायदा-तोटा समजतो. त्यामुळे मोजक्या भांडवलदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांना गुलाम बनवणारे कारस्थान रचण्याचे धाडस पुन्हा करू नये. मोदींनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी भविष्यातील योजनांचा आराखडा शक्य तितक्या लवकर जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.