रांची – कर्णधार रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा दुसऱ्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेत तिसऱ्या सामन्यापूर्वीच मालिका खिशात टाकली. आता तिसरा सामना येत्या रविवारी कोलकाता येथे होणार आहे.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 154 धावांचे आव्हान भारतीय संघाने 17.2 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. भारताच्या डावाची धडाक्यात सुरुवात करताना कर्णधार रोहितने राहुलच्या साथीत संघाला भक्कम सलामी दिली.
यावेळी राहुलने पहिल्या सामन्यातील अपयश दूर करताना दमदार अर्धशतक फटकावले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवताना तो 65 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 49 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार फटकावले. रोहितनेही अर्धशतक पूर्ण करताना 36 चेंडूत 1 चौकार व तब्बल 5 षटकार फटकावताना 55 धावा केल्या. त्यानंतर तो लगेचच बाद झाला.
त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने निराशा केली. मात्र, व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी 18 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. अय्यरने 2 चौकारांसह नाबाद 12, तर पंतने 2 षटकारांसह नाबाद 12 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साउदीनेच भारताचे तीन फलंदाज बाद केले.