नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात दिवसेंदिवस करोनाचा वाढता प्रादुर्भाव व करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत पडणारी भर, जीडीपीतील घसरण, देशाची खालावलेली अर्थव्यवस्था, रोजगाराचा प्रश्न इत्यादी मुद्यांवरून राहुल गांधी यांनी भारत सरकार व माध्यमांवर जोरदार टीका केली आहे.
Modi Govt’s ‘well-planned fight’ against Covid has put India in an abyss of:
1. Historic GDP reduction of 24%
2. 12 crore jobs lost
3. 15.5 lac crores additional stressed loans
4. Globally highest daily Covid cases & deaths.But for GOI & media ‘sab changa si’.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 12, 2020
“करोनाविरोधातील मोदी सरकारच्या ‘सुनियोजित लढाई’ने भारताला तळागाळशी ढकलले आहे -१.जीडीपीमधील ऐतिहासिक २४ टक्के घसरण २.१२ कोटी रोजगार गेले ३.१५.५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अडकलेले कर्ज ४.जगभरात करोनाचे दररोजचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू… मात्र भारत सरकार व माध्यमांसाठी ‘सब चंगा सी’.” असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
भारत आणि चीन यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या स्थितीवरून देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. “चीनने आपल्या भूभागावर मिळवलेला ताबा सुद्धा अॅक्ट ऑफ गॉड आहे का? चीनने आपली जमीन घेतली आहे. सरकारकडे ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची काही योजना आहे का? की याला पण आता अॅक्ट ऑफ गॉडच म्हणायचे?,” असे ट्विट राहुल यांनी केले होते.
तसेच, सध्याच्या घडीला बिघडलेली देशाची स्थिती सुधारण्यासाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन सल्ले देखील दिले होते. १. गरीबांच्या बँक खात्यात पैसे जमा करा २. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघू आणि मध्यम उद्योगांना वाचवा. त्यांना आर्थिक डबघाईतून सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्या ३. खासगीकरण थांबवा, फक्त मित्रांना फायदा करुन देणं बंद करा, देशाची युवा पिढी तुमच्याकडे आशेने पाहते आहे. त्यांना दिलासा देणे हे तुमचे काम आहे, असे राहुल गांधींनी आपल्या ट्विट अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करून म्हटले होते.