नवी दिल्ली – रोज नवीन विषयांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लॉकडाऊनच्या काळात श्रमिक स्पेशल रेल्वे ट्रेन मधून सरकारने केलेल्या कमाईवरून सरकारवर हल्ला चढवला आहे.
सरकारने या विषेश रेल्वे गाड्या चालवून 428 कोटी रूपयांची कमाई केली आहे त्या बातमीचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने आपत्तीच्या काळाला कमाईच्या काळात परावर्तीत करून गरीबांना लुटले आहे.
देशात रोगाची साथ पसरली आहे, लोक अडचणीत आहेत पण याही स्थितीचा लाभ घेता येऊ शकतो हे सरकारने दाखवून दिले आहे. हे गरीब विरोधी सरकार आपत्तीच्या काळातही पैसे कमावण्याच्या कामात व्यस्त होते असे त्यांनी म्हटले आहे. या संबंधात वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातमीचे कात्रणही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर जोडले आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या या टिकेला रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही त्वरीत प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटले आहे की इतकी वर्ष देशाला लुटलेल्या लोकांना सबसीडीतही लूट दिसते आहे. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांचा रेल्वे प्रवास खर्च करण्याची तयारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दर्शवली होती त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला आहे.
माहिती अधिकारातून जी माहिती संबंधीत अर्जदाराने मिळवली आहे त्यानुसार सरकारने लॉकडाऊन काळात अडकलेल्या मुजरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी ज्या विषेष रेल्वे गाड्या चालवल्या त्याच्या तिकीट विक्रीतून रेल्वेला 429 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तथापि या गाड्या चालवण्यासाठी रेल्वेला 2142 कोटी रूपयांचा खर्च आला आहे असे अधिकृत आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. रेल्वेने जून 29 पर्यंत एकूण 4615 रेल्वे चालवल्या त्याच्या तिकीट विक्रीतून 428 कोटी रूपये मिळाले आणि जुलै मध्ये ज्या 13 गाड्या चालवण्यात आल्या त्याच्या तिकीट विक्रीतून आणखी 1 कोटी रूपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.