नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भाजपच्या निशाण्यावर आहेत. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ‘राहुल गांधी यांनी 10 जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे बनू शकत नाही” असे म्हटले आहे.
राहुल यांनी लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी 25 मार्च रोजी “माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत, असे म्हटले होते.
राष्ट्रीय राजधानीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जीतो अहिंसा रनमध्ये अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, सावरकरांचा अपमान केल्याबद्दल देश राहुल गांधींना कधीही माफ करणार नाही. राहुल गांधींनी 10 जन्म घेतले तरी ते सावरकर होऊ शकत नाहीत. याआधी 28 मार्च रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सावरकरांवर टीका न करण्याचा इशारा दिला होता.
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत, ”जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी सावरकरांप्रमाणेच अंदमान तुरुंगात राहावे.” असे म्हटले होते.