मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी येत्या 25 मे रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. राहुल गांधी हे राजीव सातव यांच्या कुटुंबियांना भेटणार असल्याची माहिती आहे.
हिंगोलीत कळमनुरी इथे येऊन राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन राहुल गांधी करणार आहेत. राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. राजीव सातव यांचे 16 मे रोजी निधन झालं होतं.
राजीव सातव यांचे निधन झाले, यावर आजही विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा भावना खासदार राहुल गांधी यांनी शोकसभेत व्यक्त केल्या होत्या.