नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही सुरुवातीला करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने करोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती व्यवस्थित हाताळली. उद्धव ठाकरे यांचं काम प्रभावी असल्याचं मत लोकांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे. देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत करोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम काम केल्याचं मत ट्विटवर अनेकांनी व्यक्त केलं आहे.
‘आज तक’ वृत्तवाहिनेचे प्रसिद्ध पत्रकार आणि एन्कर प्रभू चावला यांनी ट्विटरवर एक पोल घेतला होता. त्यात त्यांनी चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत करोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणत्या मुख्यमंत्र्यांचं काम प्रभावी ठरलं, असा प्रश्न विचारला होता.
प्रभू चावला यांनी टाकलेल्या पोलमध्ये सर्वाधिक मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहे. अर्थात 62.5 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीला प्रभावी म्हटलं आहे. तर दुसऱ्या स्थानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून त्यांच्या कामाला 31.6 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.
Which Chief Minister has handled the second #Covid wave most effectively? @vijayanpinarayi @myogiadityanath @ArvindKejriwal @CMOMaharashtra
— PrabhuChawla (@PrabhuChawla) May 19, 2021
तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (4.6 टक्के) आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (1.3 टक्के) आहे. या पोलमध्ये एकूण 2 लाख 67 हजार 248 लोकांनी आपलं मत नोंदवलं होतं.