नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, या मागणीने पक्षात धरलेला जोर दिवसागणिक वाढत आहे. मात्र, राहुल पुन्हा अध्यक्ष बनणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते. त्यांची ती कृती स्वपक्षाचेच टेन्शन वाढवणारी ठरली आहे.
पुढील काही दिवसांत कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशात राहुल यांना अध्यक्ष बनवण्याच्या मागणीचे ठराव मंजूर करण्याचा सपाटा कॉंग्रेसच्या प्रदेश शाखांनी लावला आहे. त्यामुळे बहुतांश कॉंग्रेसजनांना राहुल यांच्याकडेच पक्षाची धुरा असावी असे वाटत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, राहुल पुन्हा अध्यक्ष न बनल्यास पक्षातील अनेकांचा भ्रमनिरास होईल. त्यातून पक्षातील अस्वस्थता वाढण्याचीच शक्यता आहे.
राहुल यांच्या नेतृत्वाखाली सध्या पक्षाची महत्वाकांक्षी भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यासाठी सध्या ते केरळमध्ये आहेत. तिथून ते काही काळासाठी शुक्रवारी दिल्लीत येणार असल्याचे समजते. त्यांची ती दिल्ली भेटही सस्पेन्स वाढवणारी ठरणार आहे.