म्हाडा 10 दिवसांत पालिकेकडे घरे करणार हस्तांतर
मुंबई : माहुल येथील प्रदुषणग्रस्त भागातील नागरीकांना पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दिलासा दिला आहे. प्रदुषणग्रस्त 300 कुटुंबियांना म्हाडाची घरे दिली जाणार आहेत. म्हाडाकडे उपलब्ध असलेली घरे तातडीने मुंबई महानगरपालिकेडे हस्तांतरीत करावीत.
तसेच पालिकेने या घरांमध्ये अतिप्रदुषणग्रस्त कुटुुंबियांना तातडीने पुनर्वसन करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाछयांना दिले आहेत.
माहुल येथील प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. प्रदुषणामुळे आमचे स्थलांतर करा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
स्थानिक कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत मंगळवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत पुनर्वसनासाठी सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेली 300 घरे म्हाडाने पुढील 10 दिवसात मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करावी. तसेच मुंबई महापालिकेने या 300 घरांमध्ये अतिप्रदुषीत भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
उर्वरीत घरांचेही पुनर्वसन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माहुल येथील वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादीत न राहता मुंबईतील इतर भागातही होत आहे. त्यामुळे हे प्रदुषण नियंत्रीत करणे काळाची गरज आहे. याअनुषंगाने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल.
माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पुर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी करणे, उद्योगांकडून सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करुन घेणे आदींबाबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
बैठकीस गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद म्हैसकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.